

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष सुरू होवून तीन महिने होत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये अद्याप उर्दू, मराठी माध्यमांची पुस्तके मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही १०० टक्के पुस्तके वाटप केली असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभाग म्हणत आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वरसह इतर तालुक्यांत विशेषतः उर्दू माध्यमांची पुस्तके मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लवकरात लवकर पुस्तके द्या, अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविली जातात. यंदा दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आल्याने नव्या पुस्तकांची आवश्यकता वाढली आहे.
रत्नागिरीसह इतर तालुक्यात मात्र या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आह. परिणामी शैक्षणिक सत्र होवून तीन महिने उलटले तरी पुस्तकांअभावी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मराठी, उर्दूच्या शेकडो विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाविना वर्गात बसावे लागत आहे. उर्दू माध्यमातील तिसरी, चौथी व सहावीच्या विषयांची स्थितीही अशीच आहे.
पाठ्यपुस्तकांशिवाय अध्यापन करावे लागत असून विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींना सामना करावा लागत आहे. पटसंख्येवर आधारित पुस्तकाची मागणी नोंदवली असतानाही प्रत्यक्षात शेकडो पुस्तक संच कमी आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके द्या, अशी मागणी पालक, विद्यार्थी व शिक्षकांमधून होत आहे.
मग पुस्तके गेली कुठे?
मराठी, उर्दू माध्यमातील पुस्तके कमी पडत असल्याचे शिक्षण विभागास विचारल्यास ते म्हणतात.. आमच्याकडून तर १०० टक्के पुस्तके वितरीत झाली आहेत. मग अद्याप उर्दू माध्यामातील विद्यार्थ्यांना पुस्तके का मिळाली नाहीत? त्यामुळे प्रत्यक्षात पुस्तके गेली कुठे, याची चौकशी करून विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत अशी मागणी होत आहे.