

चिपळूण : तालुक्यातील सह्याद्री खोर्यातील तिवरे गावावर पुन्हा एकदा भूस्खलनाचे संकट आहे. अतिवृष्टीमुळे तिवरे गावठाण परिसरातील डोंगराला भेगा गेल्या असून काही भागदेखील खचला आहे. त्यामुळे दीडशे घरांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागातील लोकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. मात्र पर्यायी व्यवस्था न झाल्याने अजूनही येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली त्याच ठिकाणी वास्तव्य करीत आहेत.
तिवरे गावाने वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीला तोंड दिलेले आहे. २०१९ मध्ये फुटलेले तिवरे धरण आणि त्यानंतर तिवरे भेंदवाडी धरणाच्या पाण्यात वाहून गेली. २२ लोकांचा यामध्ये मृत्यू झाला. त्या आधीपासूनच या भागात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. सातत्याने अतिवृष्टीत डोंगराला भेगा पडणे, डोंगर खचणे अशा घटना घडत आहेत.
मध्यंतरी या भागातील डोंगराला पडलेल्या भेगांची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात आली होती. मात्र, आता यावर्षी पुन्हा एकदा तिवरे गावठाणमधील डोंगराला तडे गेले असून काही ठिकाणचा भाग खचलादेखील आहे. येथील ग्रामस्थ प्रकाश शिंदे यांनी, शासनाने याची गंभीर दखल घ्यावी व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.