

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर विविध टप्प्यांत पूर्णतः निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११५ अन्वये हा आदेश जारी केला आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास आणि गणेशमूर्तींचे आगमन लक्षात घेता ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन क्षमता असलेले ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी अवजड वाहनांना महामार्गावर बंदी राहणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११, तसेच १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ आणि २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांवरील निर्बंध लागू राहतील. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पुन्हा अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश बंद राहणार आहे.