

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर येत्या काही दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून, जिल्ह्यात रात्रभर ढगांच्या गडगडाटात, विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपासून दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. चोवीस तासांत ३३५.४२ मिमी इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण, खेड आणि लांजात झाला आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. अखेर पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. जिल्ह्याला ३१ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्यावर आहे. उर्वरित कोदवली, बावनदी, काजळी नदी भरलेली असून असाच पावसाचा जोर राहिल्यास इशारा, धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. पावसामुळे उर्वरित भात, नाचणी लावणीला वेग आला असून येत्या काही दिवसांत भात, नाचणी लावणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. आतार्यंत जिल्ह्यात सरासरी १ हजार ८०१ मिमी, ५३ टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत, आणखी काही दिवस पावसाचा जोर असणार आहे. १ ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी होणार असून मध्यम प्रकारचा पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. जिल्ह्यात मध्यम, मुसळधार पाऊस सुरूच आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम आहे. मात्र दिवसा कधी मुसळधार, तर दुपारच्या सत्रात ऊन पडत आहे.