

गुहागर : जिल्ह्यातील पहिली सीबीएसई शाळा येथे सुरू झाली. यामुळे शाळा बंद करून येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. यामध्ये कोण राजकारण करत आहे, ते मला चांगले माहीत आहे. यामुळे संस्थाचालक, आरजीपीपीएल व पालकांनी एकत्र बसून ही शाळा सुरू ठेवून तिचा शैक्षणिक दर्जा सुधारावा. यामुळे १५ दिवसांत शाळा बंद करणे सोपे नसून शाळा बंद होणार नाही, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
येथील आरजीपीपीएल आवारात असलेल्या बालभारती पब्लिक स्कूल ही सीबीएसई शाळा १ एप्रिल पासून बंद करण्यात येत असल्याचे पत्र संस्था चालकांनी दिले होते. त्याचबरोबर १ एप्रिल पासून रोटरी क्लबची शाळा सुरू होणार अशी प्रक्रिया सुरू होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आरजीपीपीएल कंपनीमध्ये कंपनी व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन व पालक यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पालकांकडून म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्वांनाच कानपिचक्या दिल्या. कोणतीही शाळा १५ दिवसात बंद करणे सोपे नाही. त्यासाठी वर्षभर प्रक्रिया करावी लागते. शाळा बंद करून त्याठिकाणी रोटरी क्लब शाळा सुरू होणार असा कोणता प्रस्ताव केला आहे का, याची विचारणा करत जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडूनही तसा प्रस्ताव आल्याची माहिती घेतली. मात्र, शाळा बंद करण्याचा किंवा नवीन शाळा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे समोर आले. यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी या शाळेचे व्यवस्थापन बदलावे. त्यासाठी संस्था चालकांनी पालकांबरोबर बैठक घेऊन दर्जेदार शिक्षणासाठी योग्य ते बदल करावेत. या शाळेतील मुख्याध्यापकामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असून संस्थेने त्यांना बदलावे आणि दर दोन महिन्यांनी पालकांसोबत बैठक घ्यावी. आरजीपीपीएल कंपनीने पूर्वीप्रमाणे संस्थेला आवश्यक तो सीएसआर फंड द्यावा, अशा सूचना केल्या.
मुलांच्या शिक्षणाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही. कोण राजकारण खेळत आहे. याबाबत मला सविस्तर माहिती आहे. शाळा बंद करून त्याठिकाणी दुसरी शाळा आणण्यासाठी कोण, कुठे बैठक घेत आहे. याबाबत मला सविस्तर माहिती आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पहिली सुरू झालेली ही सीबीएसई शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. जर ही शाळा बंद करून दुसरी संस्था हवी असेल तर रोटरी क्लबच का? महाराष्ट्रातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक नामवंत शाळांना आमंत्रित करा. नवीन शाळा सुरू करण्यासाठी पालक व संस्थाचालक यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवून तसा प्रस्ताव करत वर्षभरात प्रक्रिया पूर्ण करावी. मात्र सदर शाळा बंद करू नये, अशा सूचना यावेळी सर्वांना दिली. तर यावेळी संस्थाचालकांनी आपण दर्जेदार शिक्षण देऊन ही शाळा बंद करण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही दिली.
दरम्यान, घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पालकांमध्येच दुहेरी भूमिका दिसून आली. ती शाळा बंद करून दुसरी शाळा आणण्यासाठीचा एक गट तर या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारून हीच शाळा सुरू ठेवावी. अशा मागण्यांचा दुसरा गट यावेळी क्रियाशील दिसला. यावेळी पालकमंत्र्यांनी शाळेला विरोध असलेले व शाळेच्या समर्थनात असलेले पाच पाच सदस्य, संस्थाचालक व कंपनी प्रशासन यांनी एकत्र बसून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी यावेळी सूचना दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात पहिले अद्ययावत अशा निरामय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. सद्यस्थितीत भग्नावस्थेत असलेले रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वीची रुग्णालय चालवणारी संस्था व या रुग्णालयाला शासनाच्या आरोग्य विभागातून निधी खर्ची पाडता येईल का यासाठी माझे तीन वर्षे प्रयत्न सुरू असून सदर रुग्णालय सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. यामुळे रत्नाभरात निरामय रुग्णालय पुन्हा सुरू होईल अशी घोषणा यावेळी केली.
या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी आकाश निगाडे, तहसीलदार परिक्षित पाटील, राजेश बेंडल, विपुुल कदम, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, महेश नाटेकर, सभापती प्रणव पोळेकर, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, संस्था चालक, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत, राजेश कीर, आरजीपीपीएलचे अतुल देसाई आदी उपस्थित होते.