

दापोली : जागतिक कांदळवन दिनानिमित्त हर्णे समुद्र किनाऱ्यावर पर्यावरण संरक्षणासाठी 'टाकाऊ मासेमारी जाळे हटाव' मोहीम उत्साहात राबविण्यात आली. जेएनके मरीन ॲक्वा लाइफ, हर्णे, रत्नागिरी शोभिवंत मत्स्यपालक ट्रस्ट, वन्यजीव बचाव ट्रस्ट, दापोली आणि सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोहिमेत समुद्रातील सुमारे ११५ किलो टाकाऊ व खराब मासेमारीची जाळी हटविण्यात आली.
समुद्र किनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकून पडलेली ही टाकाऊ जाळी समुद्री कासव, मासे, खेकडे, प्रवाळ आणि इतर सागरी जीवांसाठी जीवघेणा सापळा ठरत होती. स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेत ही जाळी बाहेर काढून तिची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी जमा केली. या उपक्रमामुळे समुद्री जैवविविधतेच्या संरक्षणाला हातभार लागला असून सागरी परिसंस्था अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.
या मोहिमेत वन्यजीव बचाव ट्रस्ट, दापोलीचे सचिव तुषार महाडिक व त्यांची टीम, दापोली वन विभागाचे वनरक्षक प्रभू साबणे, विश्वंभर झाडे, शुभांगी गुरव, सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, हर्णेच्या अध्यक्षा सना काझी, उपाध्यक्षा सारिका पवार, रत्नागिरी शोभिवंत मत्स्यपालक ट्रस्टचे अध्यक्ष फहाद जमादार तसेच ग्रामपंचायत हर्णेचे कर्मचारी सहभागी झाले.