

रत्नागिरी : संगेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी भरघोस निधीची घोषणा सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तसे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. संभाजीराजांचे स्मारक उभारण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि सरदेसाई वाड्याच्या मालकांची बैठक घेतली. यावेळी जागा मालकांनीही याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणार्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा राज्यभर आहेत. त्यामध्ये संगमेश्वरातील कसबा हे प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. याच ठिकाणी महाराजांना विश्वासघाताने पकडण्यात आले होते. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणार्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी कसबा येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली आहे.
शासनाने कसबा येथे स्मारक उभारण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे पर्यटनाला आता चालना मिळणार आहे. परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. कसबा येथील स्मारक उभारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरीत असताना अधिकार्यांची आणि ज्या वाड्यात छत्रपती संभाजी राजे थांबले होते. त्या वाड्याचे जागा मालक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी जागा मालकांनीही या स्मारकासाठी अनुकूलता दर्शवली असून, आपल्या भावनाही त्यांनी पालकमंत्र्यासमोर व्यक्त केल्या.
दरम्यान, याबाबत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकाबाबत बोलताना भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले की, स्मारकासाठी जे जागा स्वखुशीने देतील, त्यांना रेडीरेकनर दराच्या पाचपट रक्कम दिली जाईल आणि जर भूसंपादन करावे लागले तर चारपट रक्कम दिली जाईल, असे स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीराजांचे कसबा येथील सरदेसाई यांच्या वाड्यात वास्तव्य होते. हा वाडा स्मारक स्वरुपात जतनासाठी राज्य शासनाने याला मंजुरी दिली असून, वाड्याच्या जागा मालकांना विश्वासात घेऊन भव्य स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकामुळे जगाला छत्रपतींच्या शौर्याने स्फूर्ती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.