रत्नागिरी : तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ मिळणार नसल्याने भाजपचे माजी आमदार बाळ माने टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या भाजपाच्या बैठकीत तसे भावनिक आवाहन त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. मी पक्षाची 40 वर्षे सेवा केली. मी आता निघालो आहे. मला अन्य पक्ष स्वीकारायला तयार आहे. मी तुमच्यातून गेलो तरी परका वाटणार नाही, असे स्पष्ट करत उबाठा सेनेत जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
माजी आमदार बाळ माने यांच्या भावनिक आवाहनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीत महायुतीचे पदाधिकारी विविध कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त रत्नागिरी दौर्यावर होते. त्यांनी भाजपला रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 जागांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच जागा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे गेली दोन वर्षे उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने तालुका पिंजून काढणारे भाजपचे माजी आमदार बाळ माने यांची घोर निराशा झाली. त्यांनी त्यानंतर तत्काळ तालुका कार्यकारिणीसह अन्य पदाधिकार्यांची रत्नागिरी भाजप कार्यालयात तातडीची बैठक बोलावली. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सर्वांना भावनिक आवाहन केले. रत्नागिरी-संगमेश्वर हा मतदारसंघ भाजपाला मिळणार नसल्याने मला रत्नागिरीकरांच्या हिताकरिता अन्य पक्षात जावे लागत आहे. मी तुमच्यातून गेलो तरी परका वाटणार नाही, असे सांगितल्यानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या. आम्ही तुमच्यासोबत असू, असा विश्वास माने यांना त्यांनी दिला. माने यांच्या निर्णयामुळे अनेक राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे. माने महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ते मातोश्रीवर जाऊन आल्याची जोरदार चर्चा रत्नागिरीत सुरू होती. त्यावेळी उबाठा गटाच्या पदाधिकार्यांनी भाजपातील एक बडा नेता पक्षात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. तेव्हापासूनच रत्नागिरीतील राजकीय बदलाचे संकेत मिळत होते.