रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात अन्न सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवून कारवाईचा बडगा उचलला आहे. एप्रिल ते आतापर्यंत ८ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, ६ लाख १४ हजार ४७० रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ३२ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. १५१ आस्थापनांची पाहणी करण्यात आली.
जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध विभाग काम करीत असतो. सणाच्या काळात अन्नात भेसळचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अन्न व औषध विभाग सतर्क झाले आहे. एप्रिल, मे, जून व जुलै महिन्यात हॉटेल, बेकरी, डेअरीसह विविध आस्थापनांची चौकशी करून अन्नाचे नमुने घेण्यात येत आहे. संशयित अन्नाची जप्ती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध दुकाने, हॉटेल्स व उत्पादकांकडून ८९ नमुने गोळा केले आहेत. यापैकी आतापर्यंत ३२ नमुन्यांचे अधिकृत अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तसेच बाजारातील भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पनीर तपासणी मोहीमही राबवण्यात आली. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालय परिसरातील जंक फूड विक्री रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.