

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत कोणीही मालक नाही, सर्वजण कार्यकर्ते आहेत. एकही आमदार पडू देणार नाही, असे मी विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितले होते. हा शब्द खरा करून दाखविला. बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण यावर जनतेने शिक्कामोर्तब केला. त्यामुळे दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. रत्नागिरीत आज (दि.१५) आयोजित आभार सभेत ते बोलत होते. (Eknath Shinde on Uddhav Thackeray)
दिल्लीत माझा सत्कार झाल्यावर टीका केली जात आहे. महादजी शिंदे यांच्या नावावरून राजकारण करू नका. ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले, त्यांच्यावरही तुम्ही टीका करता, असा निशाणाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. निवडणुकीत जिंकले की ईव्हीएम चांगले, आणि हरले की ईव्हीएमला विरोध, अशी अवस्था विरोधकांची झाल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लाडका भाऊ हे पद सर्वात मोठे आहे. लोकसभेत ठाकरे गटापेक्षा २ लाख मते जास्त शिवसेनेला मिळाली. विधानसभेलाही आम्हाला १५ लाखे मते जास्त मिळाली, असे सांगून विजयामध्ये कोकणी माणसांचा सिंहाचा वाटा आहे. मविआ सरकारने बंद केलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले. महायुतीच्या काळात राज्याला नंबर वन केले, महाराष्ट्राला गतीमान करण्याचे काम केले, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.