

कडवई : पाऊस पडेल का? लग्न होईल का? पैसा येईल का? असं म्हटलं की लगेच मान हलवून हो! म्हणणारा नंदीबैल आणि त्यासोबत कानी पडणारा गुबूगुबू या वाद्याचा आवाज आता काळाच्या ओघात लोप पावत चालला आहे. काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सर्रास दिसणारे नंदीबैल आता क्वचितच पहायला मिळत असल्याने आताच्या पिढीला त्याचे कुतूहल वाटत आहे.
बागायती पट्ट्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली की, वासुदेव, बहुरूपी, नंदीवाले, कडकलक्ष्मी आदी लोककलाकारांची वर्दळ असायची. रोज कुणी ना कुणी शेतात खळ्यावर, मळ्यावर प्रसंगी घराच्या उंबरठ्यावर येऊन कला सादर करून आशीर्वाद देऊन मिळेल ते धान्य घेऊन पोटाची खळगी भरायचे. मात्र बदलती जीवनशैली या जणू कलाकारांच्या जीवावर उठली आहे. मनाने दिलदार असलेल्या बळीराजाकडून पसाभर धान्य घेऊन सर्वांचे मनोरंजन करून हे कलाकार दाद मिळवायचे. विशेष म्हणजे नंदीबैलवाले आपल्या जवळ भलामोठा बैल घेऊन पावसाचा, लग्नाचा आणि भरमसाठ पैशाचा मान हलवत अंदाज सांगायचे आणि त्यांचा अंदाज खराच ठरला तर पुढच्या वेळेस आल्यावर आणखी मोठे आदरातिथ्य व्हायचे.
मात्र आता खेडेगावालाही शहरीकरणाचा रंग येऊ लागल्याने एरव्ही घराच्या बाहेर शेतात काम करणाऱ्या मालकीणबाई आता बंगल्यात एसीची हवा खाताना दिसतात. बाहेर कुणी व्यक्ती येऊन थांबली तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही ही खंत बहुरूपी बोलून दाखवतात. पोटाची खळगी भरण्याइतपत धान्य, प्रेम, आदर मिळत नाही. त्यामुळे व्यवसाय बदलण्याकडे कल आहे, असेही त्यांनी सांगितले. आधुनिक पिढीने जीवनशैली जगताना मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपली संस्कृती, लोककला, परंपरा जपणे गरजेचे आहे. सध्या अनेक जुन्या गोष्टी आताच्या जीवनशैलीत पुन्हा उदयास येत असताना या लोककलेलाही अधिक महत्त्व येईल, असे दिसते.