

खेड : कोकणात मोठा गाजावाजा करत शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांनी गुरूवारी (दि.१३) खेडमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र याला चोवीस तास उलटतात न उलटतात तोच या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने खेड नगरपालिका निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागा देत बोळवण केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.१४) दापोली येथील कार्यालयात बैठक घेत आपल्या पदाचे राजीनामे दिले असून हि एकतर्फी केलेली युती मान्य नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना कळविले आहे.
बुधवारी (दि.१२) सकाळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार सौ. माधवी बुटाला यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपला नगरसेवक पदाच्या तीन जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले. मात्र ही घोषणा करताना भाजपला विश्वासात घेतले का असा प्रश्न उपस्थित केला गेला. जर आमच्या एकाही नेत्याला याबाबत काहीच माहिती नसेल तर नक्की ही युती कोणी केली? असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
आज सकाळपर्यंत या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या खेड, दापोली, मंडणगड येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दापोली कार्यालयात बैठक घेत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रवेश केल्यावर भाजपची खेड मधील ताकद वाढली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने सन्मानपूर्वक जागा वाटप करावे अशी भाजपच्या पदाधिकारी यांची इच्छा होती मात्र शिवसेनेने केवळ 3 जागा भाजपला देऊ केल्या आहेत. नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपची एक प्रकारे चेष्टाच शिवसेनेने केली असल्याचा संदेश या निमित्ताने सर्वसामान्य मतदा्रांमध्ये गेला आहे.
भाजपने या निवडणुकीत उपनगराध्यक्ष व किमान 8 ते 9 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा हाती केवळ 3 जागाच आल्या. याबाबतची वस्तुस्थिती तातडीने वरिष्ठांच्या कानावर जावी म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना कळविल्या आहेत. या बैठकीला माजी आमदार सुर्यकांत दळवी, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सरचिटणीस भाऊ इडाते, महिला अध्यक्षा स्मिता जावकर, दापोली तालुकाध्यक्ष जया साळवी आदींसह खेड, दापोली, मंडणगड येथील बहुसंख्य प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने दिलेल्या तीन जागा हा सन्मान नसून अपमानच आहे. त्याचप्रमाणे भाजपचे नेते वैभव खेडेकर आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जी अपमानास्पद भाषा वापरली आहे तिचा आम्ही निषेध करत असून आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही असा इशाराही यावेळी केदार साठे यांनी दिला.