रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : बदलापूर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. महाराष्ट्रात मुलीबाळींच्या भावनेशी खेळणार्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, ही केस फास्ट ट्रॅकवर चालणार आहे, संस्था चालकांवरही कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात आज (दि. २१) सांगितले. (Eknath Shinde)
बदलापूर घटनेतील आरोपीला फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. या चिमुरडींच्या जीवावर कोणीही राजकारण करू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती, त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यामुळे याठिकाणी महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही, आणि माझ्या मुलींकडे डोळे वटारून बघू नका, आम्ही खपवून घेणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. (Eknath Shinde)
महिलांच्या वाटेला कोणी जाऊ नका, नाहीतर तुम्ही जळून खाक व्हाल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सगळ्या जातीधर्माच्या बहिणींचा समावेश आहे, ही एक दिवसाची ओवाळणी नाही. तर कायमस्वरूपी माहेरचा आहेर असल्याचेही त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)
अर्थव्यवस्थेला महिलाच चांगली चालना देऊ शकतात. त्यांना माहीत असते. काटकसरीने संसार कसा करायचा. कोणतेही काम अतिशय मन लावून करताना त्यातून आर्थिक बचतही कशी करायची हे महिलांकडूनच शिकले पाहिजे. मी माझ्या आईपासून बघत आलोय, माझी पत्नीनेही अगदी काटकसरीने संसार सांभाळला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.