रत्नागिरी : बँकेचा शाखाधिकारी शेतकर्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअरची मागणी करत असेल, तर अशा शाखाधिकार्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश देतानाच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिवेशन काळात वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावली जाईल, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक, बागायतदार यांच्या अडी-अडचणी संदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, सिबिल स्कोर मागून बँका जर त्रास देत असतील तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकर्यांना, आंबा बागायतदारांना मिळवून देण्यासाठी तसेच जे साडेचार कोटी रुपये परत गेले आहेत त्यासाठीदेखील वित्तमंत्री अजित दादांच्या बरोबर एकत्रित बैठक घेतली जाईल.
या बैठकीला सहकार मंत्र्यांनाही निमंत्रित करु. शेतकर्यांचे निश्चितपणे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु. यानंतर पालकमंत्र्यांनी सांडे लागवण व काळबादेवी गावातील भूसंपादनाबाबत रेवस रेड्डी महामार्गाबाबत, जेएसडब्ल्यू व कॉफिडन्स गॅसबाबत आणि ट्रक टर्मिनलच्या अडी अडचणीसंदर्भात बैठक घेवून योग्य त्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.