

चिपळूण : तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत १४ मे रोजी तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येइल. आता नव्याने आरक्षण सोडत होत असल्याने इच्छुकांचे डोळे या सोडतीकडे लागले आहेत.
गतवर्षी काढलेली सोडत रद्द झाली आहे. नव्याने होणाऱ्या आरक्षणात नामाप्र वर्गासाठी ३५ ऐवजी ३४ तर खुल्या प्रवर्गासाठी ८९ ऐवजी ९० जागा आरक्षित केल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींत सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत निवडणुका न झाल्याने सरपंचाना प्रशासकीय कारभार पाहण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे. सरपंच प्रशासकीय कारभार करत असले तरी धोरणात्मक निर्णय घेण्यास शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे नव्याने होणारी कामे रखडलेली आहेत. गतवर्षी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र ३० एप्रिल २०२६ रोजी शासनाने अधिसूचना काढून सरपंच आरक्षणात बदल केला आहे. नव्या बदलानुसार नामाप्र वर्गाची एक जागा कमी होणार असून खुल्या गटातील एक जागा वाढणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींत इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आरक्षणानुसार तेथील इच्छुक कामाला लागले होते. मात्र, नव्याने होणाऱ्या आरक्षणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील तहसील कार्यालयात १४ मे रोजी सकाळी ११ वाजता सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींना तसेच महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.