

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील वाजेगाव येथे पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक अखेर पूर्ववत झाली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने बुधवारपासून हा मार्ग एस.टी. बसेस आणि लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी अद्याप अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेशबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
वाजेगाव येथील नाल्यावरील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, संबंधित ठेकेदाराने नाल्यातूनच एक तात्पुरता रस्ता तयार केला होता. मात्र, दि. 17 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा भराव वाहून गेला आणि चिपळूणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा कुंभार्ली घाट मार्ग पूर्णपणे बंद झाला. सुरुवातीला 48 तासांत डागडुजी करून केवळ खासगी छोट्या वाहनांना प्रवेश देण्यात आला होता.
हा मार्ग बंद झाल्याचा सर्वाधिक फटका एस. टी. महामंडळाला बसला आहे. चिपळूण, खेड, गुहागर, दापोली आणि मंडणगड या आगारांच्या पुणे, कोल्हापूर, मिरज, शिर्डी, लातूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या अनेक फेर्या रद्द कराव्या लागल्या. काही फेर्या आंबा घाट आणि ताम्हाणी घाटमार्गे वळवण्यात आल्या होत्या. या पंधरा दिवसांच्या कालावधीत एस.टी. महामंडळाचे एक कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, चिपळूण एमआयडीसीतील मालवाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने औद्योगिक क्षेत्रालाही मोठे नुकसान सोसावे लागले. बुधवारी सकाळपासून उत्तर रत्नागिरीतील आगारांच्या एस.टी. बसेस कुंभार्ली घाटमार्गे कोयना, पाटण, कराडकडे रवाना झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन चिपळूण आगारप्रमुख श्री. चव्हाण यांनी केले आहे.