रत्नागिरी : जिल्ह्यातील चोरगे अॅग्रो फार्मने कोकणातील पर्यावरण संवर्धन आणि कृषी क्षेत्रात एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. फार्मवर मधुमक्षिकापालन युनिटची यशस्वी स्थापना करण्यात आली असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, तसेच परागीकरण वाढून जैवविविधतेला चालना मिळणार आहे.
कोकणातील विशेष हवामान, हिरवळ आणि विविध फुलांच्या प्रजातीमुळे येथे मधमाश्यांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. याचा फायदा घेत चोरगे अॅग्रो फार्मने शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाश्यांचे संगोपन आणि मध उत्पादन सुरू केले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन कसे करायचे, याचे प्रशिक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे. या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना मधमाश्या पालनाचे तांत्रिक ज्ञान, संगोपन पद्धती, व उत्पादकता वाढवण्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणातून स्थानिक शेतकऱ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करून आपली आर्थिक स्थिती सुधारता येईल. चोरगे फार्मचे संस्थापक डॉ. निखिल चोरगे म्हणाले, मधमाश्यांचे पालन फक्त मध उत्पादनापुरते मर्यादित नाही, तर त्यांच्याद्वारे होणाऱ्या परागीकरणामुळे इतर कृषी उत्पादनातही वाढ होते. शेतकऱ्यांना मधमाश्या पालनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. या प्रकल्पासाठी खादी ग्राम उद्योगचे मास्टर ट्रेनर भारत सरकार व इंडी सहयोग परिवार संस्थेचे संचालक प्रशांत सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
चोरगे अग्रो फार्मवर उत्पादित मध स्थानिक तसेच देशभरातील बाजारपेठेत वितरित केले जाणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घेऊन मधमाश्या पालनाचे प्रशिक्षण घेतल्यास त्याचा फायदा फळबागा, भातशेती आणि इतर कृषी उद्योगांवर होईल आणि कोकणातील कृषी क्षेत्राला एक नवा आयाम मिळेल.