

रत्नागिरी : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे, पर्यटन स्थळे ही रत्नागिरीची वैभव वाढविणारी आहेत, अशा शब्दात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (दि.४) प्रशंसा केली.
मंत्री आदिती तटकरे यांनी रत्नागिरीतील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण, रत्नदुर्ग किल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेली शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा, विठ्ठलमूर्ती आणि थिबा पॅलेस येथील थ्रीडी शो भेट देवून पाहिला. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, ॲड देवेंद्र वणजू, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, माजी जि.प. सदस्य दिशा दाभोळकर, अबूशेठ ठसाळे आदी उपस्थित होते.
रत्नागिरीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्थळांच्या प्रतिकृतींचे एक स्वतंत्र दालन तारांगणमध्ये उभे करण्यात आले असल्याचे सांगत त्यांनी याबाबत कौतुक केले. त्यानंतर ही सर्व पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढविणारी आहेत. हा सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जेवढी शासनाची जबाबदारी आहे, तेवढीच येथे येणाऱ्या पर्यटकांची, नागरिकांचीदेखील आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.