रत्नागिरी : वाळवड येथे पाच वर्षांपूर्वी सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला केलेल्या आरोपीला १० वर्षांची शिक्षा | पुढारी

रत्नागिरी : वाळवड येथे पाच वर्षांपूर्वी सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला केलेल्या आरोपीला १० वर्षांची शिक्षा

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पाच वर्षांपूर्वी राजापूर तालुक्यातील वाळवड येथे किरकोळ कारणातून सख्ख्या भावावर कुर्‍हाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या खटल्यात सरकारीपक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीला न्यायालयाने आज (दि. २९) १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.

तुकाराम बाबाजी गुरव (45,रा.वाळवड गुरववाडी राजापूर, रत्नागिरी) असे शिक्षा आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात त्याचा भाऊ राजेंद्र बाबाजी गुरव याने रायपाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास राजेंद्र गुरव हे घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यावरुन वाद झालेला होता. या वादातून आरोपी तुकारामने राजेंद्रला कुऱ्हाडीने मारहाण केली. राजेंद्र यामध्ये गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर राजेंद्रने पोलीस दूरक्षेत्र रायपाटण राजापूर येथे तक्रार दिली. पोलिसांनी तुकाराम विरोधात भादंवि कायदा कलम 307, 504,506 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एस.पाटील यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.पुष्पराज शेटये यांनी सात साक्षिदार तपासात केलेला युक्तिवाद ग्राह्य मानण्यात आला. या खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एस.गोसावी यांनी आरोपी तुकाराम गुरवला दोषी ठरवत भादंवि कायदा कलम 307 अन्वये 10 वर्ष सक्तमजूरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस काँस्टेबल किरण सकपाळे यांनी काम पाहिले.

Back to top button