आर्थिक निकषावरील आरक्षणाचा निर्णय संसदेला घ्यावा लागणार : शिवेंद्रसिंह भोसले

आर्थिक निकषावरील आरक्षणाचा निर्णय संसदेला घ्यावा लागणार : शिवेंद्रसिंह भोसले

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : एक ना एक दिवस भारतात आर्थिक निकशावर आरक्षण द्यावे लागेल संसदेला तसा निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट मत साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांनी व्यक्त केली.

राजेशिर्के प्रतिष्ठान, पुणे या संस्थेच्या दहावा वर्धापन दिन सोहोळा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील भागिरथीबाई राजेशिर्के सभागृहात रविवारी सकाळी संपन्न झाला. या वेळी राजेशिर्के परिवार व आप्तेष्टांच्या स्नेहमेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, एमपीएससीचे माजी चेअरमन किशोरराजे निंबाळकर, सातारा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, राजेशिर्के प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष राजेशिर्के, शिरकाई प्रतिष्ठानचे दत्ताजी राजेशिर्के, मार्केट यार्डचे सभापती विक्रम पवार, शिरकाई प्रतिष्ठानचे सुनिल राजेशिर्के, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, राजेशिर्के प्रतिष्ठान पुणेचे माजी अध्यक्ष शिवसिंह राजेशिर्के, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य निकिता सुर्वे आदी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत राजेशिर्के प्रतिष्ठान, पुणेचे अध्यक्ष सुभाषराव राजेशिर्के, माजी अध्यक्ष शिवसिंह राजेशिर्के, सरचिटणीस प्रदीप राजेशिर्के, कल्याणी राजेशिर्के, जितेंद्र राजेशिर्के, अनंत राजेशिर्के, सरचिटणीस प्रदीप राजेशिर्के सुभाष राजेशिर्के आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. अध्यक्ष सुभाष राजेशिर्के यांनी सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यावर अवलंबून न राहाता व्यवसायाकडे वळा, असे आवाहन केले.

यावेळी आ शिवेंद्रराजे भोसले म्हणाले ,आज ना उद्या देशाच्या संसदेला आर्थिक निकषावर आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागेल. मराठा आरक्षणाचा विषय आल्यावर ,धनगर ,मुस्लिम आरक्षणासाठी लढे सुरू झाले. ओबीसी एकवटले . समाजात जातीय तेढ निर्माण झाले. उद्या एखाला आरक्षण दिले की दुसरा रुसणार, तिसरा आंदोलन करणार त्यामुळे हा आरक्षणाचा तिढा तेढ निर्माण करणारा आहे . ही सामाजिन दुफळी देशाला परवडणारी नाही. देशाच्या एकसंघतेला ती धोकादायक आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. ज्याचे उत्पन्न कमी त्याला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे ,मग तो मराठा असो, ब्राम्हण असो, मुस्लिम असो की मागासवगीर्य असो तो लाभ त्याला मिळायला हवा. तरच आरक्षणाचा तिढा सुटेल त्यामुळे आज ना उद्या आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल अशी स्पष्ट भूमिका आ शिवेंद्रराजे भोसले यांनी या मेळाव्यात मांडकी.

आमदार शेखर निकम यांनी प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक करताना कुटुंबातील एक सदस्य म्हणून संवाद साधताना आनंद होत असल्याचे सांगितले. कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच शृंगारपूर येथे महाराणी येसूबाईंचे स्मृतिस्थळ उभारण्यासाठीही आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही या वेळी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news