

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाने पाचजणांवर सपासप वार करून त्यांना रक्तबंबाळ केले आहे. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी युवराज शंकर पवार (३३, रा. खेर्डी दातेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली असून जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
युवराज पवार व फिर्यादी संकेश विश्वास उतेकर यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळे दोघांच्याही मनात राग होता. सोमवारी रात्री संकेश उतेकर हा बहादूरशेख चौक येथे आपल्या मित्राबरोबर बसला असताना त्या ठिकाणी युवराज पवार आला व मला मागील घटनेबद्दल तुझ्याशी बोलायचे आहे, जरा ऐकून घे असे सांगितले. मात्र, संकेशने ते ऐकण्यास नकार दिला. मला काहीही ऐकायचे नाही; मी निघालो, असे सांगून तो बाहेर पडला. यानंतर आपले ऐकून घेत नाही याचा राग येऊन युवराज पवार याने वाद घातला व दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात युवराज याने धारदार हत्याराने त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी त्याने संकेशच्या मित्रावर देखील हल्ला केला. तसेच त्या ठिकाणी भांडण सोडविण्यास आलेल्या अन्य एकावर देखील त्याने वार केले.
यामध्ये संकेश शंकर उतेकर (२५), श्रीराम धोंडू झगडे (२६), सागर राजेंद्र चिंदरकर (२४), प्रकाश भगवानराव मोरे (३९) आणि तन्वीर खेरटकर हे पाचजण जखमी झाले. त्यांच्या हातावर व अंगावर वार झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी संकेश उतेकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलिसांनी युवराज पवार याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.