

खेड; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रघुवीर घाट मार्ग धोकादायक होऊ शकतो. त्यामुळे दरड कोसळून मानवी जिवीतास धोका उद्भविण्याची शक्यता असल्याने सूरक्षिततेची उपाययोजना म्हणून खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट हा आजपासून (दि. २०) ते ३१ जुलै पर्यंत पर्यटकांकरिता बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी आज (दि. २०) दिले आहेत.
खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. परंतु रघुवीर घाट रस्ता व डोंगर भागालगत दरड कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट व डोंगर भागालगत कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. रघुवीर घाट हा पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी लोकांची ये-जा तसेच लोकांचे या क्षेत्रास भेट देण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दरम्यान सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट हा २० ते ३१ जुलै २०२३ पर्यंत पर्यटनाकरिता बंद राहणार आहे.