रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची होणार चौकशी

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची होणार चौकशी
Published on
Updated on

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनांची गांभिर्याने दखल घेत जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी याबाबत सखोल चौकशी करण्याबाबतची माहिती दिली आहे. यासाठी एकसदस्यीय समिती गठीत केली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती म्हसे यांनी दिली.

तिथीनुसार दि. २ जून व तारखेनुसार दि. ६ जून २०२३ रोजी रायगड किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दि. २ जून २०२३ रोजी ओमकार दिपक भिसे (वय 19 वर्षे रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव) व दि.४ जून रोजी प्रशांत गुंड  (वय २८ वर्षे रा. पुणे) या तरुणांचा मृत्यू झाला.  या मृत्यूंच्या घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ. योगेश म्हसे यांनी या घटनांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार एकसदस्यीय समिती गठीत केली आहे.

उपविभागीय दंडाधिकारी यांनी नमूद दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन अहवाल त्यांच्या अभिप्रायासह तातडीने पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

महाड प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांना 1) घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सर्व स्तरावर सखोल चौकशी करणे. 2) शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या महाड बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली अगर कसे? याबाबत चौकशी करणे. 3) सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करुन घेणे.4) सदर घटना या कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत निरीक्षण नोंदविणे 5) सदर घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल आपल्या स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच या सोहळयाच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखास चौकशी अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यासाठी अथवा अहवाल सादर करण्यास बोलाविल्यास त्यांनी तात्काळ हजर राहणे अथवा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल. असे करण्यास कुचराई केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 मधील कलम 51, 55 व 56 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी सूचित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news