रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार शाळांमध्ये घंटा वाजणार | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार शाळांमध्ये घंटा वाजणार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या प्रकारामुळे राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होण्याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, शैक्षणिक विभाग या निर्णयावर ठाम राहिल्याने आता जिल्ह्यातील 2 हजार 522 शाळांमध्ये बुधवारी घंटा वाजणार आहे. जवळपास दोन वर्षांनंतर मुलांचा किलबिलाट पाहायला मिळणार आहे. पहिली ते चौथीच्या वर्गात 46 हजार 164 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सध्या राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. आता 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला होता. आरोग्य विभागाने तसेच डॉक्टरांच्या कृती गटानेत्यास संमती दिली होती. मात्र, ‘ओमायक्रॉन’च्या भितीमुळे प्राथमिक शाळा सुरू करायच्या की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. असे असले तरी शैक्षणिक विभाग आपल्या निर्णयावर ठाम राहिला आहे.

शाळा सुरु करण्यापूर्वी कोरोना संसर्गापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सोेमवारी याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात केली जाणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गटशिक्षणधिकार्‍यांनी सुचना दिलेल्या आहेत. पालकांच्या बैठका घेऊन शाळा उघडण्यास सांगण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन शासनाच्या आदेशाचे काटेकोरपण पालन करावयाचे आहे. तालुकापातळीवर कार्यवाही केली जात आहे. व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने काही जिल्हा परिषद शाळांच्या कामकाजाला आरंभ झाला आहे.

रत्नागिरी, चिपळूणसह जिल्ह्यातील शहरी भागातील प्राथमिक शाळांचे वर्ग बंदच होते. शासनाच्या आदेशानंतर पालकांच्या संमतीने हे वर्गही सुरु होत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे शाळा बंदच असल्याने पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत प्रवेशच केलेला नव्हता. हे विद्यार्थी शाळांचा अनुभव घेणार आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या 2 हजार 522 शाळा आहेत. या सर्व शाळा बुधवारपासून सुरू होणार आहेत. पहिली ते चौथीचे एकूण 46 हजार 164 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामुळे तब्बल दोन वर्षानंतर शाळेत पुन्हा किलबिळाट पहायला मिळणार आहे.

या सूचनांचे पालन अत्यावश्यक

शाळा निर्जंतुकीकरण करणे, हात धुण्यासाठी व्यवस्था करणे, तापमापक उपलब्ध करून देणे, वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांची शाळेत जाण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक केले आहे. दोन लस घेतलेल्या शिक्षकांसह कर्मचार्‍यांना शाळेत प्रवेश द्यावा. बैठक व्यवस्था करताना एका बाकावर एक विद्यार्थी, दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर, मास्क अत्यावश्यक, थुंकण्यावर बंदी, शाळेतील कार्यक्रमांवर बंधने, विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहेत.

Back to top button