सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण राज्य मार्गावरील वाहतूक धोकादायक! | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण राज्य मार्गावरील वाहतूक धोकादायक!

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ – मालवण मार्गावर नेरूर जकात ते श्री देव नागदा मारूती मंदिर दरम्यानच्या पुलाच्या काँक्रिटचा काही भाग पावसाने कोसळला. तसेच दोन ते तीन फूट रस्ताही खचला असल्याने या मुख्य मार्गावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. सध्या तेथे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतू अवघड वाहतूक बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे.

कुडाळ तालुक्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कुडाळ-मालवण या राज्य मार्गावरील नेरूर कलमेवाडी नजीकच्या ओढ्यावरील पुलाला बसला. या ओढ्याच्या पाणी पातळीत शुक्रवारी (दि. २१) वाढ झाली होती. पाण्याचा प्रवाह मोठा होता. या पाण्याने रात्री या पुलाची १५ ते २० फूट लांबीची काँक्रिटची संरक्षक भिंत कोसळली तसेच दोन ते तीन फूट रस्ताही खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक असुरक्षित बनली आहे. या रस्त्यावरून वाहनांची सतत ये-जा असते. मात्र या पुलाचा भाग खचल्याने तेथे वाहतूक धोकादायक बनली आहे.

शनिवारी (दि. २२) सकाळी नेरूर सरपंच भक्ती घाडी, माजी सरपंच शेखर गावडे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, समद मुजावर, बाळा पावसकर, अजित मार्गी, राजन पावसकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सा.बां.विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधून माहीती दिली. परंतू अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचा-यांनी काही वेळाने धाव घेत पाहणी केली.

या पुलाची संरक्षक भिंत कोसळून रस्ताही खचला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सा.बां.उपविभागाच्या उपअभियंता यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहीती देण्यात आली असून त्यांनी येत्या आठ दिवसांत या ठिकाणी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर बॅरल उभे करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Back to top button