Four-lane on Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा चौपदरीकरणाची एक लेन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार | पुढारी

Four-lane on Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा चौपदरीकरणाची एक लेन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाची सिंगल लेन पूर्ण होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळुणात व्यक्त केला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या निवेदनांचा त्यांनी स्वीकार केला. (Four-lane on Mumbai-Goa highway)

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 30) सकाळपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. सिंधुदुर्गपासून कशेडी, भोगावपर्यंत त्यांचा हा पाहणी दौरा होता. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजातील वाकेडपासून चिपळूणपर्यंतची पाहणी केल्यानंतर ते येथील शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी थांबले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत 100 टक्के पूर्ण होणार आहे, याची खात्री आहे, तर उर्वरित चौपदरीकरणापैकी एक लेन पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशी आम्हाला खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, यानंतर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. (Four-lane on Mumbai-Goa highway)

याप्रसंगी त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारली. यावेळी माजी आ. डॉ. विनय नातू, रमेश कदम, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, शहर अध्यक्ष आशिष खातू, रामदास राणे, माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सावर्डे ग्रामस्थांनी देखील ना. रवींद्र चव्हाण यांना चौपदरीकरणाच्या समस्येबाबत निवेदन दिले. यानंतर ना. चव्हाण पुढील पाहणी दौर्‍यासाठी रवाना झाले.

हेही वाचा

Back to top button