रत्नागिरी : काजू मंडळाच्या ‘पंचवार्षिक’ला १,३२५ कोटींची तरतूद | पुढारी

रत्नागिरी : काजू मंडळाच्या ‘पंचवार्षिक’ला १,३२५ कोटींची तरतूद

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाला संजीवनी देण्यासाठी निर्माण करण्यात येणार्‍या काजू मंडळाच्या पंचवार्षिक योजनेत 1,325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीसाठी कोकणातच प्रक्रिया केंद्र करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रामध्ये काजूची लागवड आहे. या लागवडीतील लाखो टन काजू बोंडे केवळ फेकून दिली जातात. मात्र, आता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी मंजूर केला असल्याने त्यातून उत्पन्नाचा मार्ग तयार होऊ शकतो.

गेली काही वर्षे बेभरवशी हवामानामुळे आंबा व्यवसाय तोट्यात जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यापेक्षा काजूची लागवड सुमारे दुप्पट आहे. मात्र, या लागवडीतील केवळ काजू बी वरच प्रक्रिया केली जाते. त्याची बोंडे वापरली जात नाहीत. त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात आतापर्यंत अनेकदा बागायतदार, प्रक्रियादारांनी पुढाकार घेतला. मात्र, त्याच्या मंजुरीतील किचकट प्रक्रियेमुळे त्यात यश आले नाही.

आता काजू बोर्डासाठी पाच वर्षांसाठी 1,325 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून फुकट जाणार्‍या काजू बोंडांना प्रक्रिया उद्योगाचे दरवाजे खुले झाले आहेत. उत्पन्न वाढीसाठी कोकणातच प्रक्रिया केंद्र करण्याची तरतूदही करण्यात आल्याने त्यातून बागायतदार शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उद्योजकांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.

  • प्रायोगिक तत्त्वावर प्रस्ताव पाठविण्याच्या कृषी विभागाच्या सूचना
  • लाखो टन वाया जाणार्‍या काजू बोंडांवर प्रक्रिया करण्यासाठी निधी मंजूर
  • मंजुरीची प्रक्रिया किचकट असल्याने बागायतदारांना वारंवार अपयश

Back to top button