नवी दिल्ली, प्रशांत वाघाये : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटप राजधानी दिल्लीतून जवळजवळ सुटल्यात जमा आहे. एक एक दिवस पुढे सरकत असताना सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक ताकदीने तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दिल्लीत पार पडली. त्यानंतर पुन्हा एक बैठक काँग्रेसच्या छाननी समिती सोबत पार पडली. येत्या २० तारखेला काँग्रेसच्या छाननी समितीची आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर काँग्रेसची पहिली यादी जाहीर होऊ शकते. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही दिल्ली दौरा केला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये दिल्लीतील नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा दिल्लीतील गाठीभेटी आणि बैठकांमुळे सुटल्यात जमा आहे.
दुसरीकडे महायुतीचेही समीकरण जमले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी पार पडली. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये जवळपास सर्व जागांचे वाटप झाले आहे. तसेच यापुढे भाजपमध्ये पुन्हा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार नाही. उर्वरित गोष्टींचा निर्णय हा राज्यातच होणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये भाजप व्यतिरिक्त शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाबद्दलच्या काही गोष्टी चंदिगडमध्ये चर्चिला गेल्या. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह यांच्या शपथविधीच्या निमित्ताने भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आणि एनडीएमधील मधील घटक पक्षांचे नेते चंदीगडमध्ये होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील चंदीगडमध्ये होते. चंदीगडमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. थोडक्यात, राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील चर्चा ही दिल्लीच्या माध्यमातून अंतिम झाली आहे. यावर अंतिम मोहोर चंदीगडमध्ये लावण्यात आली. त्यामुळे लवकरात लवकर दोन्ही आघाड्यांमधील उमेदवार जाहीर होणे अपेक्षित आहे.