

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Election Results 2024) पराभवानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने (Maharashtra Pradesh Congress Committee) हे वृत्त फेटाळून लावले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप- महायुतीने २३० जागांवर दणदणीत विजय मिळवला. यात भाजपला १३२, शिंदे शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला (MVA) केवळ ४६ जागा मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेस १६ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला १० जागांवर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने हे वृत्त खोटे असून ते चुकीच्या पद्धतीने पसरवले जात असल्याचे म्हटले आहे. नाना पटोले यांनी कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत राजीनाम्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले २०२१ पासून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला होता. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
पटोले यांनी रविवारी बोलताना म्हटले होते की, नवनिर्वाचित महायुती सरकार त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात आणि प्रचारातील भाषणांमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करेल, अशी खात्री आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी भर दिला की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून निवडून आलेल्या महायुतीने आता १,५०० रुपयांवरून २,१०० रुपयांपर्यंत वाढवण्याच्या त्यांच्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करावी.