

बीड, पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली असून बीड विधानसभा मतदारसंघात डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत आहोत. दोन दिवस सर्व राजकीय परिस्थिती कार्यकर्त्यांना बोलून समजून घेतली. त्यांच्या भावना समजून योग्य तो निर्णय घेतला आहे. आगामी काळात आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जोमाने लढायच्या आहेत. तेव्हा सारे मनापासून कामाला लागा, असे आवाहन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून मंगळवारी ते बोलत होते. व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. विठ्ठल क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, विजयाताई क्षीरसागर (महिंद्रे), डॉ. सारिकाताई क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबीय आणि क्षीरसागर कुटुंबाचे हितचिंतक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मी आज परत एकदा सर्वांच्या समोर आलो आहे, दोन दिवस संपूर्ण राजकीय परिस्थिती आणि आपल्या एकूण भावनेचा विचार करून आणि पुढील राजकीय आयुष्याचा विचार करून एक चांगला निर्णय आपण घेत आहोत. आपण आयुष्यभर माझी साथ दिली आहे. प्रत्येक निवडणुकीत आपण खंबीरपणे पाठीशी राहिलात, आपण विश्वासाने काम करत राहिलो, अर्ज मागे घेईपर्यंत हे गणित कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, मात्र एकृष्ण सुरू असलेल्या सर्वच राजकीय चित्रावरून अर्ज मागे घेण्याचा आपण निर्णय घेतला. आपल्याला आपले ध्येय गाठायचे होते. उद्दिष्टे आपण ठरवलेली होती. परंतु नाईलाजाने आपण अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या या वाटचालीत अनेक चढ-उतार आपण बघितले आहेत. वश-अपयश पचवलेलेच आहे सध्याचे चित्र समोर आहे, गेल्या सहा महिन्यापासून आपण सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला.
प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला, मात्र असे असतानाही जो निर्णय घेतला. तो घेत असताना माझ्याही मनाला खूप वेदना झाल्या. परंतु माझ्यापेक्षा माझ्या कार्यकत्यांची मने देखील महत्त्वाची होती. काही निर्णय, गोष्टी कार्यकर्त्यांच्या मतावरच ठरत असतात. आज आपण सर्वांच्या हितासाठीच डॉ. योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंचा देत आहोत. आपल्या विचारानुसार आणि मतानुसार तो सुद्धा योग्य तो सन्मान राखील याची शाखती देतो. भविष्यात होणारी वाटचाल ही आपल्या मतानुसारव चालेल, असे मत मांडले.
क्षीरसागर यांचा बंगला पुन्हा एक झाला आहे, बंगला हे नाव जनतेने आमच्या घराला दिले आहे. निवडणुकीत तीन क्षीरसागर उभे होते पण आम्ही आता एकत्र येऊन दोन केले आहेत. येत्या २३ तारखेला दोनचे एक होईल असे सांगत त्यांनी आपलाच विजय होईल आणि तो जयदत्त अण्णांच्या आशीर्वादाने असेल असा आत्मविश्वास प्रकट केला. आगामी काळात अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बीड विधानसभा मतदारसंघाचा विकास आणि साऱ्या समाज घटकांना एकत्र ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले. अण्णांना मी आशीर्वाद मागितला आणि त्यांनी तो दिला. त्यांच्याबरोबर सर्व नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा माझ्याकडून सन्मान राखला जाईल, असा शब्दही यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दिला.