

नंदुरबार : आम्ही तीस वर्षात काय केलं त्याचा लेखाजोखा लोकांना तोंडी पाठ आहे. जिल्हा निर्मिती केली, रस्ते धरण बंधारे पूर्ण करण्याबरोबरच शेती विकास केला. हे करत असतानाच शेतकऱ्यांना गायी, बकऱ्या दिल्या, महिलांना गृह उद्योग दिले, गरिबांना घरे दिली, इतकच नाही तर भांडे गॅस सुरक्षा संच हे सुद्धा आमच्य प्रयत्नांमुळे लोकांना सरकारकडून मिळाले. हे सर्व मतदारांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही तीस वर्षात काय केलं असा प्रश्न करून विरोधकांनी जनतेचा कळवळा दाखवण्याची गरज नाही. लोकांसाठी काय केले, याचा हिशोब आमच्या विरोधकांनी मांडावा, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कॉर्नर सभांमधून बोलताना दिले.
कुकावल, कोठलीत, वडाळी, कोंडावळ, काकर्दे दिगर, काकर्दे खु., खापरखेडा, अभनपुर, हिंगणी, तोरखेडा, दोंडवाडे, फेस, बामखेडा आणि अन्य गावांमधील मतदारांशी संपर्क साधला तसेच कॉर्नर सहभाग घेऊन आपली भूमिका मांडतांना महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit Minister of Tribal Development of Maharashtra) बोलत होते. ज्येष्ठ नेते दिपक बापू पाटील,जि.प.बांधकाम सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य के.डी.नाईक, भाजपा ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, प्रकाशा मंडळाध्यक्ष विजय पाटिल, रविंद्र राउळ, प्रशांत चव्हाण, उमेश पाटील, रामराव बोरसे, संजय भदाणे, तुळशीराम कोळी, सुनील कुवर, कृष्णा कोळी, दिलवर माळचे यांच्यासह परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी तुमची केवळ दिशाभूल केली. भूलथापा देत गेले. दर महिन्याला साडेआठ हजार रुपये दिले जातील असे म्हणाले होते. तुम्हाला खटाखट पैसे मिळाले का? त्याच्या उलट मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार आपल्या शब्दांवर ठाम आहे, भूमिकेवर ठाम आहे. मोदी सरकारने सांगितले होते आरक्षण हटवणार नाही सत्ता आल्यानंतर त्यांनी आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि याच्यापुढेही लागणार नाही. राज्यातील महायुती सरकार लाडक्या बहिणींना पैसे देत आहे, पिक विमा विज बिल माफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहेत. या व्यतिरिक्त गावागावात पाणी योजना रस्ते वीज दिली जात आहे. म्हणून यापुढे मतदारांनी भुलथापांना बळी पडू नये; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले. लोकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास यापुढेही चालू राहील आणि त्या कामाच्या बळावर निश्चितच आमचा विजय होणार आहे; असाही विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.