नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निवडीचे काम जोरात सुरू झाले आहे. भाजपने उमेदवार निवडीसाठी निवडणूक समितीची बैठक घेतली. २० ऑक्टोबरला काँग्रेसची बैठक होणार आहे. त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. या यादीत ५० हून अधिक उमेदवारांची नावे येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या छाननी समितीची पुन्हा एकदा २० ऑक्टोबर रोजी सकाळी बैठक होणार आहे. यामध्ये काँग्रेसकडे असलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांबाबत विचारमंथन केले जाणार आहे. छाननी समितीकडे ८८ जागांची यादी आली होती. त्यांपैकी बैठकीमध्ये आतापर्यंत सुमारे ६० जागांवर चर्चा झाली आहे. या ६० जागांवर उमेदवार निवडीचे काम पूर्ण झाले. मात्र, यापैकी ३ ते ४ जागांवर पुन्हा चर्चा होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छाननी समितीच्या बैठकीत ही चर्चा होणार आहे. उमेदवारांची पहिली यादी त्याच दिवशी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली जाईल. केंद्रीय निवडणूक समितीची बैठक २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.
या बैठकीत ५५ ते ५८ नावांना मंजुरी दिली जाणार आहे. त्याची यादीही रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांची नावे असतील. यासोबतच छाननी समितीमध्ये ज्यांच्या नावांवर एकमत झाले आहे, अशा उमेदवारांच्या नावांचाही समावेश करण्यात येणार आहे. अशी दोन डझनहून अधिक नावे या यादीत असतील. काल झालेल्या छाननी समितीने विद्यमान आमदारांव्यतिरिक्त एकच नाव असलेल्या जागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे. याला केंद्रीय निवडणूक समितीची अधिकृत मान्यता मिळणे बाकी आहे.