शिर्डी येथे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छूकांच्या मुलाखतीवेळी आ. कानडे व ससाणे समर्थक समोरासमोर आले. गेल्यावेळी अन्य पक्षाच्या उमेदवारांसोबत असणारे लोकप्रतिनिधी आज समवेत असल्याचा आरोप करत ससाणे व ओगले समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गटातील प्रमुखांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. या सर्व प्रकार पक्षनिरीक्षकांसमोर सुरू होता. त्यामुळे श्रीरामपुरातील काँग्रेसअंतर्गत गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली असून ही भविष्यातील संघर्षाची नांदी ठरणार आहे.
यावेळी पक्षनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार मुजफ्फर हुसेन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, आ. लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सभापती सुधीर नवले, काँगेस तालुकाध्यक्ष अरुण नाईक, सचिन गुजर, संजय फंड, बाबासाहेब दिघे, अंजुम शेख, मुजफ्फर शेख, अंकुश कानडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, आशिष धनवटे, राजेंद्र सोनवणे, सनी आढागळे, अशोक कानडे, कलीम कुरेशी, रियाज पठाण, कार्लस साठे, विष्णुपंत खंडागळे, प्रसाद पटारे, राजू चक्रनारायण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिर्डी येथे पक्ष निरिक्षक येणार म्हणून आ. लहू कानडे व करण ससाणे गटामार्फत हेमंत ओगले गट आपले शक्ती प्रदर्शन दाखविण्यासाठी सज्ज दिसले. या बैठकीस दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपापल्या नेत्यांच्या बाजूने घोषणाबाजी करत होते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत चांगलाच गोंधळ घातला. असा हा भयानक प्रकार घडत पक्ष निरीक्षकांना श्रीरामपूरातील गटबाजीचे प्रदर्शन पहावे लागले.
या वादावर प्रतिक्रिया देताना आमदार कानडे म्हणाले, पक्ष निरीक्षकांसमोर काँग्रेसच्या मुलाखती सुरू होत्या. यावेळी ज्यांनी गोंधळ घातला त्याला याची कारणे विचारली पाहिजे. त्यांची उत्तरे मी कशी देऊ शकतो, अशा शब्दात ते अंतर्गत गटबाजीने हवालदिल झालेले दिसले. यावेळी असे काय कारण झाले की विद्यमान आमदाराचे तिकीट कापले जाणार आहे, असा सवालही कानडेंनी व्यक्त केल्याचे दिसले.
ओगले म्हणाले, मी काँग्रेसकडून उमेदवारी मागत आहे. आज कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी होणे हे साहजिकच आहे. विद्यमान आमदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. संघटनेबरोबर न राहता जे विरोधात काम करत होते, त्या सर्वांना बरोबर घेतले. पाच वर्षात विकास कामांना खीळ घातली.त्याचा राग मतदारसंघांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. यावेळी पक्ष संघटना पूर्णपणे आपल्याबरोबर असून नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सोसायटीचे सदस्य, प्रमुख काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल या सर्व संघटना आपल्या सोबत आहेत. आजची घटना हा उद्रेक नसून लोकशाहीचे प्रतीक आहे. काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्याची संधी आहे. त्या माध्यमातून काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी मुलाखतीला आल्यानंतर दोन्ही गटातले कार्यकर्ते समोरासमोर आल्याने घोषणाबाजी झाली. या पूर्वीपासून लोकप्रतिनिधींविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याची वरिष्ठ दखल घेतील.