राहुरी : पुढारी वृत्तसेवा : पाचशे वर्षांच्या प्रतीक्षे नंतर अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाले. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक घरातून दाळीच्या लाडूचा प्रसाद गेला पाहिजे, म्हणून आम्ही प्रत्येक घरात साखर व दाळीचे वाटप करत आहोत, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी केले.
राहुरी येथे मल्हारवाडी रोडच्या केशररंग मंगल कार्यालय व स्टेशन रोड येथे पांडुरंग लॉन्स येथे खा. डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी साखर व दाळीचे वाटले. यावेळी खा. विखे बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांनी काहीही आरोप करु द्या, आम्ही काही राजकारण करीत नाही. पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे राम मंदिर उभारले. तेथे श्रीरामाची मुर्तीची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी प्रत्येक घरातून दाळीचे लाडू प्रसाद म्हणून गेले पाहिजे. या हेतून आम्ही साखर व दाळ वाटप करीत आहोत.
सर्व खर्च मी व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले स्वखर्चातून करीत आहोत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असे खा. विखे यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री कर्डिले म्हणाले, मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे महसूल खाते आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरु केली. निवडणूक जवळ आली की, राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न समोर घेतात, मात्र अद्याप 'त्यांना' शहरातील रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही.
मंत्री विखे यांच्या प्रयत्नांमुळे शहरात शासनाची 100 एकर जागा मिळाली. विरोधक यासाठी विरोध करणार, हे निश्चित आहे, मात्र लवकरच शहरात सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय, पोलिस ठाणे, तहसील इमारत होणार. ज्यांना घर व जागा नाही, त्या गोर गरीब लोकांना लवकरच घरकुल मिळणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी महिला- पुरुषांनी साखर व दाळ वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतला. महिलांनी खा. डॉ. सुजय विखे व मा. मंत्री शिवाजी कर्डिले यांचे आभार मानले.
हेही वाचा