

अहिल्यानगर : राज्य सरकारने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकर्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असून, येत्या 8 ते 10 दिवसांत या कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भरणे यांनी शेतकर्यांसाठी दिलासादायक माहिती दिली.
मंत्री भरणे म्हणाले, सर्वात महत्त्वाची यावर्षीची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने यावर्षी शेतकर्यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. येणार्या दहा दिवसांमध्ये कर्जमाफी केली जाईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी यांची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांना सांगतो, असे भरणे म्हणाले.
धनगर समाजातील तरुण आणि मेंढपाळांसाठी कृषी विभागाच्या वतीने एक नवीन विशेष योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या योजनेवर काम सुरू असून याचा फायदा समाजातील युवकांना होईल, असे भरणे यांनी सांगितले.