धनगर आरक्षणप्रश्नी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा घेवून, अंमलबजावणी करा : सकल धनगर समाजाची मागणी

धनगर आरक्षणप्रश्नी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा घेवून, अंमलबजावणी करा :  सकल धनगर समाजाची मागणी

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधिमंडळाच्या मंगळवारी (ता. २०) होणा-या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणप्रश्नी विधिमंडळात चर्चा घेवून, धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देत सकल धनगर समाजाच्या वतीने रविवारपासून सूरू असलेले ठिय्या आंदोलन सोमवारी मागे घेण्यात आले. मात्र धनगर आरक्षणप्रश्री राज्य सरकार संवेदनशील नसल्याने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

धनगर आरक्षणप्रश्री सकल धनगर समाजातर्फे रविवारी (ता.१८) चौंडी ते मुंबई आरक्षण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने हस्तक्षेप करत आरक्षण दिंडीला चौंडीतच रोखले. यावर आंदोलनकर्त्यांनी कालपासून चौंडीतच ठिय्या दिला होता. सोमवारी (ता.१९) तहसीलदार गणेश माळी आणि पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी चौंडीत येवून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर, गोंविदराव नरूटे, नितीन धायगुडे, सुरेश बंडगर, घनश्याम हाके, संतोष बिचुकले,अक्षय शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे ,राज्यातील सुमारे ३ कोटी लोकसंख्या असलेला धनगर समाज मागील अनेक वर्षापासून अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) अंबलबजावणीसाठी आंदोलन करत आहे. विद्यमान राज्य सरकार धनगर समाज्याच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे सांगते, परंतु समाजाला आरक्षण मिळत नाही. या संदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या शिंदे समितीने अद्याप अहवाल दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षण प्रश्नावर चर्चा होऊन ,आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी १९ फेब्रुवारी २०२४ पासून चोंडी येथे आत्मक्लेश आंदोलन करत आहोत.

शासनाने या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी. अन्यथा २१ फेब्रुवारी २०२४ पासून राज्यभर उग्र आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अभ्यासगटातील दोन सदस्य आंदोलनात.

धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण लागु करण्यासाठी बिहार,मध्यप्रदेश व तेलंगणा या तीन राज्यांचा आरक्षण अंमलबजावणी अभ्यास करण्यासाठी तीन महिण्यापुर्वी राज्य सरकारने नेमलेल्या अभ्यासगटातील आरक्षण अभ्यासक माणिकराव दांगडे आणि गोंविदराव नरुटे हे दोघे चौंडीत ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावरून राज्य सरकारने अभ्यासगटाची स्थापना करून,वेळकाढुपणा करून, उघडपणे फसवणूक करत असल्याची भावना धनगर समाज बांधवांमध्ये व्यक्त होत आहे. तीन महिण्यात या अभ्यासगटाला तीन राज्यांचा अभ्यासदौरा करून, राज्य सरकारला अहवाल द्यायचा आहे. मात्र आज तीन महिण्यानंतर केवळ दोन राज्यांचा अभ्यासदौरा या अभ्यासगटाने केला आहे.

राज्य सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक

धनगर आरक्षणप्रश्री चौंडीत येवूण ५० दिवसात आरक्षण अंमलबजावणी करू म्हणणारे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजण आज १५० दिवसातही काहीही कार्यवाही करताना दिसत नाही. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी अभ्यासगटाची स्थापना केली. मात्र हा अभ्यासगटाने गेल्या तीन महिण्यात केवळ दोन राज्यांचाच दौरा केला आहे. या अभ्यासगटात सरकारनेच नेमलेले दोन अशासकीय सदस्य आरक्षणप्रश्री आंदोलनात सहभागी होत आहेत. यावरून सरकार उदासिन असल्याचे दिसत असून, सरकारचे हे अपयश मानले जात आहे. सन २०१४ पासून धनगर आरक्षणप्रश्री सरकार केवळ वेळकाढुपणा करत असल्याची भावना धनगर समाजात व्यक्त होत आहे. यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी वरील प्रश्र उपस्थित केले आहेत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news