काष्टी : पुढारी वृत्तसेवा : लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधत, चोरट्यांनी दरवाजा कटरने तोडून घरातील 6 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना शनिवारी (दि.20) रात्री श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवारातील साईनगर येथे घडली. याबाबत मारुती बाबुराव लाड (रा.स्टेशन रोड, साईनगर, काष्टी) यांच्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाड हे काष्टी येथून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन रस्त्यावर शेतात राहतात. त्यांचे लहान भाऊ डॉ.नवनाथ लाड यांच्या मुलाचे 22 जानेवारीला लग्न असल्याने मेहंदी कार्यक्रमासाठी लाड कुटुंबीय शनिवारी रात्री आठच्या सुमारास घराला कुलूप लावून काष्टी गावात लहान भावाच्या घरी गेले होते. लाड कुटुंबीय घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांना दिसले.
घरात जाऊन पाहिले असता कपाटाचे कुलूप उघडून उचकापाचक केल्याचेे दिसून आले. कपाटात लटकविलेल्या पिशवीतील दोन लाख रूपये रोख, तसेच सुटकेसमध्ये ठेवलेले एक लाख रुपये आणि पेटीत ठेवलेले 18 हजार रुपये, असे एकूण 3 लाख 18 हजार रूपये चोरीला गेल्याचे आढळले. तसेच, कपाटातील 3 लाख 64 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण 6 लाख 82 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कळविल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस उपनरीक्षक समीर अभंग यांना तपासासाठी सूचना करत घटनस्थळी डॉग स्कॉड तसेच फिंगर प्रिंट अधिकारी बोलावत तपास सुरू केला.
हेही वाचा