मराठा आरक्षण हा ऐतिहासिक निर्णय : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : कोविडच्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही मंत्रालयात फिरकले नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते, याची आठवण करून देतानाच मराठा आरक्षण हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. या वेळी संगमनेर तालुक्यातील 29 शाळांना डिजीटल बोर्डाचे वितरण करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील 1 हजार 800 ज्येेष्ठ नागरिकांना आणि 563 दिव्यांगांना केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या साधन साहित्यांचे वितरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खा. सदाशिव लोखंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शहराध्यक्ष श्रीराम गणपूल, निराधार योजनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष अमोल खताळ, भाजपचे वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे, भाजप किसान मोर्चा राज्य सरचिटणीस रवींद्र थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे, शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे, नेते अल्पसंख्यांचे रौफ शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, तालुक्यातील सुमारे 15 हजार ज्येष्ठ नागरिकांना आत्तापर्यंत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून साधन साहित्यांचे वाटप झाले आहे. तर वेगवेगळ्या नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या 44 हजार शेतकर्यांच्या खात्यात 27 कोटी 44 लाख रुपये जमा झाले असून, हे जनतेच्या मनातील सरकार आहे. त्यामुळेच जनतेच्या हिताचे निर्णय होत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
हेही वाचा