मोदी गॅरंटी म्हणता म्हणता ठाकरे गॅरंटीच्या उद्घाटनाची वेळ : उद्धव ठाकरे | पुढारी

मोदी गॅरंटी म्हणता म्हणता ठाकरे गॅरंटीच्या उद्घाटनाची वेळ : उद्धव ठाकरे

नगर : उद्धव ठाकरे सद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची अहमदनगर शहरात नुकतीच एक सभा पार पडली.. त्यावेळी ते बोलत होते.  ‘मोदी गॅरंटी म्हणता म्हणता उद्धव ठाकरे गॅरंटीच्या उद्घाटनाची वेळ त्यांच्यावर आली आहे. ही मोठी गोष्ट आहे.’ असे बोलत त्यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले.  ठाकरे पुढे म्हणाले की पक्षातून भाऊसाहेब वाघचाैरे गेले पण ते परत आले.. लोखंडे गेले ते गेलेच. वाघचाैरे आणि सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये एक फरक आहे ते म्हणजे वाघचोरे यांनी पक्ष चोरीचा प्रयत्न कधी केला नाही. गद्दारांनी भगव्याला छेद देण्याचा प्रयत्न करू नये, असेही ठाकरे यांनी म्हटले.

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल बोलतांना ठाकरे बोलले की मोदी हे घराणेशाही विरोधात बोलतात परंतु शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण ही घराणेशाही नाही का? अजित पवार तुम्हाला चालले हे कोण आहेत? एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा ही घराणेशाही नाही का? असे प्रश्न ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका करतांना उपस्थित केले. ज्या नरेंद्र मोदींना बाजूला सारायचा प्रयत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी केला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना वाचवले. याची आठवण सुद्धा ठाकरे यांनी सभेत सगळ्यांना करून दिली.

आज शेकतरी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे कोण बघत आहे? त्यांना पीक विमा नाही, हमी भाव नाही, कर्ज माफी नाही. ज्या स्वामिनाथन यांना तुम्ही भारतरत्न दिला त्यांच काम शेतकऱ्यांसाठी आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? भारतरत्नाचा बाजार लावल्याचा आरोप सुद्धा ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर केला. दिल्लीकडे येणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबद्दल बोलतांना ठाकरे म्हटले की जणू देशात युद्ध सुरू आहे. अशी परिस्थिती दिल्ली सीमेवर सद्या दिसत आहे. यांना जनतेने येणाऱ्या निवडणुकीत उत्तर द्यायला हवं. आपापले जाती-धर्म बाजूला ठेवून देशभक्त ही एकच जात घेऊन एकत्र या. असे आवाहनही जनतेला यावेळी उद्धव ठाकरे यांनी  केले.

हेही वाचा

Back to top button