Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यानंतर मंत्री विखे पाटील यांचा पलटवार, म्हणाले… | पुढारी

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यानंतर मंत्री विखे पाटील यांचा पलटवार, म्हणाले...

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : पुण्याचे काम करण्याचे भाग्य तुमच्या नशिबी आले नाही यात आमचा काय दोष आहे. पुण्याचे काम करायला सुद्धा भाग्य लागते, हे भाग्य आमच्या नशिबी आले असल्याचा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा पासून ते गुंजाळवाडी पर्यंत सुरू असलेल्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची पाहणी महसूलमंत्री तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाच्या कालव्यांना पाणी सोडण्याची प्रतिक्षा आता संपत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून पाण्याची चाचणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी होणार असल्याची बाब सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. निळवंडे प्रश्नावरून कोण काय म्हणते याकडे आम्ही आता लक्ष देत नाही. या प्रकल्पावरून झालेले रणकंदन अनेक वर्षे सर्वांनी अनुभवले आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील पाच तालुक्याचे लाभ क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात निळवंडे धरणाच्या कालव्यांमुळे नवा आशय निर्माण होत आहे. खुल्या अंतकरणाने याकडे आता पाहीले पाहीजे यानिमिताने शेतकऱ्याच्या जीवनात निर्माण होणाऱ्या आनंदात सहभागी होण्याचे अवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

काल पर्यंत वाळू अभावी कालव्यांची काम ठप्प असल्याचे वक्तव्य करणाऱ्यांना कालव्यातून पाणी सोडावे म्हणून मागणी करण्याची उपरती झाली. कालव्यांच्या कामाची सुरूवात धरणाच्या मुखापासून युती सरकारच्या काळात सुरू झाली. युती सरकारच आता पाणी देणार असल्याचे मंत्री विखे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी आ.वैभव पिचड बापुसाहेब गुळवे, भाजपचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, भाजप किसान आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य रविंद्र थोरात जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ प्रांताधिकारी शैलेश हिंगे जलसपंदा विभागाचे कार्यकारीअभि यंता अरूण नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Back to top button