पुणे : पुढारी वृत्तसेवा : लागोपाठ येत असलेल्या पश्चिमी चक्रवातांमुळे हवेच्या वरच्या थरांत वार्याचा वेग ताशी 270 ते 300 किलोमीटर आहे. त्यामुळे यंदा फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत थंडी लांबली. यंदा 11 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार असून त्यानंतर ती निरोप घेईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. 6 किंवा 7 फेब्रुवारीनंतर थंडीत वाढ होऊन ती 11 फेब्रुवारीपर्यंत राहील.
पूर्ण जानेवारी थंडीचा राहिला. प्रामुख्याने उत्तर भारतात विक्रमी थंडी राहिली. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला.
फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत यंदा राज्यात थंडीने मुक्काम ठोकला. हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, लागोपाठ पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात 12 कि.मी. उंचीवरील हवेच्या थरात ताशी 270 ते 300 किलोमीटर वेगाने वाहणार्या पश्चिमी वार्याच्या झोतामुळे यंदा जानेवारीप्रमाणे फेब्रुवारीतही पंधरा दिवस थंडीचा जोर जास्त आहे.
आगामी तीन दिवसांत कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परीक्षेत्रात तीन दिवसांत काहीसे ढगाळ वातावरण राहिल. तसेच कोकण, मध्य-महाराष्ट्रातील किमान व कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल.
येत्या दोन दिवसांत पश्चिम हिमालयीन क्षेत्रात पुन्हा नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे 5 ते 11 फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण आठवडाभर कमाल व किमान तापमानाचा पारा घसरून महाराष्ट्रात पुन्हा चांगलीच थंडी पडण्याची शक्यता जाणवते. मात्र हिवाळी हंगामासाठीचे कदाचित हे शेवटचेच थंडीचे आवर्तन ठरण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
बुलडाणा 11.3, पुणे 14.1, जळगाव 13.9, महाबळेश्वर 16.4, मुंबई 21, कोल्हापूर 19.5, मालेगाव 16, नाशिक 14.4, सांगली 18.5, सातारा 16.4, सोलापूर 21.4, छत्रपती संभाजीनगर 15.5, परभणी 16, नांदेड 17.8, अकोला 15.6, अमरावती 15.6, ब्रह्मपुरी 15.7, चंद्रपूर 14.4, गोंदिया 13.6, नागपूर 15.3 अंश सेल्सिअस
हेही वाचा