पंचवीस वर्षांपासून ‘विठ्ठल’ परिवार एकत्रित
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा गेल्या 25 वर्षांपासून ‘विठ्ठल’ परिवार एकत्रित असून ‘विठ्ठल’ परिवार संपवण्याची विरोधकांनी सुपारी घेतली असल्याचे सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी वाखरी व तावशी येथील प्रचार सभेत मत केले. गेल्या 25 वर्षांपासून विठ्ठल परिवार तालुक्यात एकसंघ आहे. गेल्या दीड वर्षापासून परिवारातील असंतुष्ट मंडळीने विठ्ठल परिवारामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विठ्ठल परिवारातील असंतुष्ट मंडळीनी मंगळवेढ्याच्या उद्योगपतीकडून पैसे घेऊन विठ्ठल परिवारामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतली आहे.
विठ्ठल कारखान्याच्या 1060 सभासदांचे पैसे देणे बाकी असताना 25 हजार सभासदांची उस बिले देणे बाकी असल्याचा अपप्रचार विरोधक करीत आहेत. याबाबत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके हे भूमिका मांडत असताना, मात्र विरोधकांनी गावातील काही सभासदांना पुढे करून बिलासंदर्भात प्रश्न विचारून त्याचे व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर पाठवून प्रचार करीत आहेत. भगीरथ भालके हे पैसे उपलब्ध करून सभासदांना देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले. यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, सुधाकर कवडे, बाळासाहेब आसबे, राजेंद्र शिंदे, विजयसिंह देशमुख, तानाजी सरदार, गोकुळ जाधव, महादेव देठे, शहाजी साळुंखे, योगेश ताड, बाळासाहेब ताड, बिबीशन जाधव, बाबासाहेब जाधव, दगडू मासाळ, मारुती मासाळ, औदुंबर घाडगे, मेजर घाडगे, यांचेसह श्री विठ्ठल कारखान्याचे कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.