मुंबई : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्यानंतर होणार्या पहिल्याच विधानसभा पोटनिवडणुकीला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याचे आवाहन पत्र लिहून केले असतानाच ठाकरे गटाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत एखाद्या आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीने विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक टाळावी, अशी भावना व्यक्त केली. तसेच ॠतुजा लटके यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. भाजप आपला उमेदवार मागे घेण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी माघारीचा शेवटचा दिवस आहे.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेचा पाठिंबा मिळावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपाचे प्रयत्न सुरू होते. राज यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे चर्चा झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांची भेट घेत मनसेत अंधेरीत पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. यावर, रमेश लटके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड व्हावी, अशी भूमिका राज ठाकरे यांनी शेलार यांच्या भेटीत स्पष्ट केले.
शेलार-ठाकरे यांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवित भाजपला निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन केले. भाजपने ही निवडणूक लढवू नये आणि ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावे, असे आवाहन राज यांनी केले. दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा निवडणूक लढविण्याची माझ्या पक्षाची भूमिका नसते, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल तर उमेदवार उभा करणार नाही, असा निर्णय घेतला होता. स्वर्गीय रमेश लटके यांचे महानगरपालिका आणि विधिमंडळातील योगदान व निवडणूक निवडून येणार्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल व महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असे आवाहन शरद पवार यांनी
केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मला पक्षातील सहकार्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करावी लागेल. यापूर्वीही आर.आर. पाटील यांच्या निधनानंतरची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही सकारात्मक निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला असल्याना मला पक्षात चर्चा करावी लागेल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.