इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असताना काही ठिकाणी मात्र काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला तेलंगणा हे एकच राज्य मिळाले. अन्य राज्यात कॉंग्रेससह मित्रपक्षांचीही कामगिरी निष्प्रभ ठरली. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसचे वधारू शकणारे भाव पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये काँग्रेसला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. देशात सर्वात जास्त लोकसभा सदस्य संख्या असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला किमान २२ जागा हव्या आहेत तर समाजवादी पक्ष मात्र केवळ ७-८ जागा काँग्रेसला देऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे काँग्रेसला जास्त जागांची अपेक्षा आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार २०१९ मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून लढलेल्या सर्व जागा लढण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे अशा काही राज्यांमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीत आतापर्यंत प्रत्यक्ष वाद झाले नसले तरी आघाडीतील पक्षांच्या विरुद्ध, नेत्यांच्या विरुद्ध आघाडीतील नेत्यांनीच काही विधाने केली. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चाही रंगल्या होत्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याही वक्तव्याचा त्यात समावेश होता.