मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’ रुपेरी पडद्यावर

रामशेज
रामशेज

पुढारी ऑनलाईन : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेच्या या अग्निकुंडात त्यांच्या असंख्य शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाची पाने चाळताना अनेक शूर मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम आपण वाचलेले आहेत. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापलं नाही तर त्यासाठी प्राणपणाने लढणारे, जीवाला जीव देणाऱ्या एकनिष्ठ सहकाऱ्यांची पिढी तयार केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही मंडळी प्रखर निष्ठेने मोगली सत्तेशी झुंजत राहिली. त्यांच्या तेजस्वी पराक्रमाची दुर्लक्षित गाथा म्हणजे, नाशिक नजीकच्या 'रामशेज' किल्ल्याची लढाई.

३५० व्या शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत 'आलमंड्स क्रिएशन्स प्रोडक्शन'ने 'रामशेज' या भव्यदिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' च्या यशानंतर आणि 'मुरारबाजी' चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरु असतानाच निर्माते अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर यांनी 'रामशेज' ही चौथी कलाकृती शिवप्रेमींसाठी घेऊन आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रातील किल्ले जिंकून आपली सल्तनत बुलंद करण्याचा मनसुबा बोलून दाखविला आणि त्याची पहिली नजर पडली 'रामशेज' किल्ल्यावर. पण हा किल्ला सर करायला त्याला एक नाही, दोन नाही.. तर तब्बल साडे सहा वर्षांहून अधिक काळ लोटला. तरीही किल्ला जिंकता आला नाही.

केवळ ६०० मावळ्यांनी हा किल्ला प्राणपणाने जपला. तो हस्तगत करण्यासाठी शहाबुद्दीन खान, फतेह खान आणि कासम खान यांसारख्या मातब्बर सरदारांनी अक्षरशः शर्थ केली पण हाती केवळ निराशा आली. त्या ६०० मावळ्यांच्या शौर्याची, चिकाटीची आणि बुद्धिचातुर्याची चित्त थरारक गोष्ट म्हणजे, 'रामशेज'. लवकरच 'रामशेज' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news