![आंबेडकर जयंती विशेष : बाबासाहेबांनी देवगिरी किल्ल्यासमोरील वापरलेला हौद नामशेष; संकल्पभूमी म्हणून जतन करण्याची गरज](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2FAmbedkar-Jayanti-Special.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर; जे. ई. देशकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1934 मध्ये एक पर्यटक म्हणून त्यांच्या अनुयायांसह तत्कालीन निजाम अधिराज्यातील दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले होते. किल्ल्यात जाण्यापूर्वी बाहेर असलेल्या हौदात हाथ, पाय धुतले होते. तो हौद आता नामशेष झाला असून, आत्ताच्या स्थितीत त्या ठिकाणी वाहन पार्किंग आहे.हे स्थळ बाबासाहेबांची संकल्पभूमी म्हणून जतन करावी असे मत डॉ. आंबेडकर पर्यटनचे संकल्पक डॉ.राजेश रगडे यांनी व्यक्त केले.
बाबासाहेबांना तुम्ही अस्पृश्य असल्याची जाणीव आणि हिन वागणूक केवळ, हिंदूनीच दिली असे नाही तर मुस्लिम समाजही आघाडीवर होता. बाबासाहेबांना असा अनुभव दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी 1934 साली आला. याचे वर्णन खुद्द बाबासाहेबांनीच वेटींग फॉर व्हिजा (waiting for a visa) या पुस्तकात केले असल्याची माहिती डॉ. रगडे यांनी दिली.
बाबासाहेब किल्ला पाहण्यासाठी आले त्यावेळी रमजानचा महिना सुरू होता. 1934 च्या काळात मुस्लिम दौलाताबाद किल्ला मुस्लिम अधीक्षकांच्या अधिपत्याखाली होता. बाबासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी किल्ल्या बाहेर असलेल्या हौदात हाथ पाय धुतले. ही बाब तेथील एका मौलवीला समजल्यानंतर त्यांनी पाणी बाटवल्यांची ओरड केली. ही ओरड झाल्यानंतर काही क्षणात मुस्लीम समाजाचा जमाव गोळा झाला व त्यांनी बाबासाहेबांना शिवीगाळ केली. विशेष म्हणजे किल्ल्यात कुठेही पाण्याला हाथ लावू नका असेही बजावण्यात आल्याचा उल्लेख त्यांच्या वेटींग फॉर व्हिजा पुस्तकात केला आहे.
आंबेडकर पर्यटनचे संकल्पक डॉ. राजेश रगडे यांनी तेथील हौदाचे नेमके स्थान शोधून काढले आहे.आणि ते त्यांच्या संशोधन पुस्तक डॉ. आंबेडकर: संस्कृती, वारसा आणि पर्यटन पान क्रमांक 149 आणि 150 वर पूर्वीच्या आणि नंतरच्या फोटोंसह प्रकाशित केले आहे. डॉ राजेश रगडे यांच्या मते या घटनेवरून असे दिसून येते की स्वातंत्र्यपूर्व काळात जी व्यक्ती हिंदूसाठी अस्पृश्य होती ती पारशीसह मुस्लिमांसाठीही अस्पृश्य होती, हे या घटनेवरून दिसून येते.
अस्पृश्य असल्यामुळेच डॉ. आंबेडकरांना बडोद्यातील पारशी सरायमधील खोली रिकामी करावी लागली. आणि त्यांना सयाजी पार्कमध्ये रात्र काढावी लागली. हे उद्यान आता संकल्पभूमी बनले आहे. याच पार्श्वभूमीवर दाैलताबाद किल्ल्याजवळ असलेल्या हौदाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या स्थळांचे दस्ताऐवजीकरण आणि जतन केले जावे आणि तेथे स्मारक उभारण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुढाकार घ्यावा.असेही आवाहन डॉ. रगडे यांनी केले आहे.
25 वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्व विभागाने पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंग बनवली. याच ठिकाणी हा हौद होता. त्याचे अवशेष आजही तेथे पाहायला मिळतात. हौदाचा आकार 20 X 20 जमिनीच्या पातळीपासून 6 ते 7 फूट उंचीवर 10X 5 फूट आकाराच्या लहान उघड्या नलिका आणि 3 ते 4 फूट उंचीसह, जवळच्या तलावातून 1 ते 2 फूट मातीच्या पाईपमधून पाणी आणलेले होते. यातील काही अवशेष आजही या ठिकाणी आहेत.