लातूर; पुढारी वृत्तसेवा : आमची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बोलणी झाली, पंरतु लग्नाची तारीख काढायला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे भटजी आडवे येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (दि.२) काँग्रेस व राष्ट्रवादीला दिला. आंबेडकर हे लातूर येथे सभेसाठी आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी हे आपसांत तसेच शिवसेनेसोबत समझोता करीत नाहीत. त्यांनी घोंगडे भिजत ठेवले आहे, ते कशासाठी ठेवल आहे हे ते सांगत नाहीत. एकंदरीत त्यांच्या या वर्तनाने कोण कोणासाठी काम करतेय याबाबत शंका घेण्यास जागा आहे. असं आंबेडकर यावेळी म्हणाले.
युती न झाल्यास वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या गटासोबत कुठलीही बोलणी करणार नाही. राज्यात भाजपला हरवणे हेच आमचे धेय्य असल्याचे त्यांनी सांगितले राज्यात सध्या सरकार नोकर भरतीसह सर्वच गोष्टीचे कंत्राटीकरण करीत आहे शासनाचे हे धोरण असंवैधानिक असून न्यायालयानेच त्यात हस्तक्षेप करुन सरकारला ही पध्दत बंद करण्याचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.