![सर्वेला फार अर्थ नाही, देशाविकासाचे मुद्दे महत्त्वाचे : डॉ नीलम गोऱ्हे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2Fneelam-gorhe.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक सर्व्हे संदर्भात आपला विश्वास नाही, राजकीय पक्ष आपापल्या सोयीने सर्वेक्षण करून घेतात असा जनतेचा आरोप आहे. दर आठवड्याला परिस्थिती बदलत असते असे सांगतानाच महाविकास आघाडीत राजकीय इच्छाशक्ती नव्हे तर केवळ स्वार्थासाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस हे जळते घर असल्याचे टीकास्त्र विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी सोडले.
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. रामटेकमध्ये काही नाराजी नाही खा कृपाल तुमाने आणि राजू पारवे हे सोबत फिरत आहेत.,स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेचा विजय निश्चित आहे. काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना काय दिले ,याचे स्मरण उद्या 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने करणे गरजेचे आहे याकडे लक्ष वेधतानाच कुठल्याही समाजाला गृहीत धरणे, आपल्या स्वार्थासाठी वापरणे आणि नंतर सोडून देणे हे चांगले नाही. वंचित बहुजन आघाडी संदर्भात आमचे मतभेद असले तरी त्यांना योग्य वागणूक महाविकास आघाडीने दिली नाही. युपीएच्या प्रमुख असताना सोनिया गांधी यांनी महिला आरक्षणाच्या संदर्भात भूमिका घेतली नाही. कधीकाळी राजीव गांधी यांनी पंचायत राज,सरकारमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग यावर भर दिला होता. मात्र 12 सप्टेंबर 1996 रोजी मांडलेले महिला आरक्षण विधेयक 2013 पर्यंत मंजूर झाले नाही.2023 साली अखेर नरेंद्र मोदी यांनी ते विधेयक आणले.यामुळे महिलांचा पंचायत राज आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग वाढणार आहे.राज्यातील 48 पैकी 20 मतदार संघ महिलांकडे येत आहेत. पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न लोकांना रोजगार अशा विविध क्षेत्रात मोदी सरकारने उत्तम काम केल्याचा आकडेवारीसह त्यांनी दावा केला.