नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे सरकारी निवासस्थान सोडले आहे. राहुल गांधी यांनी उचललेले पाऊल अनुकरणीय आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी त्यांची स्तुती केली. आज (दि.२२) सार्वजनिक सुट्टी असल्याने राहुल यांनी बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयात सुपूर्द केली नाही. यापूर्वीच शुक्रवारी त्यांनी त्यांच्या बंगल्यातील सामान शिफ्ट केले होते.
राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाच्या आदेशानुसार तुघलक लेन येथील सरकारी बंगला खाली केला आहे. न्यायालयाने त्यांना अपील करण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला होता. सुप्रीम कोर्ट अथवा हायकोर्ट त्यांना न्याय देवू शकते. परंतु, बंगला सोडण्याचा राहुल यांचा निर्णय नियमांबद्दल त्यांचा असेलला सन्मान दर्शवतो, अशी भावना शशी थरूर यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.
दरम्यान, राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. सुरत कोर्टाने २३ मार्चला त्यांना 'मोदी' आडनावासंबंधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मानहानीच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने त्यांची सदस्यता रद्द केली होती. राहुल यांनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. पंरतु, कोर्टाने त्यांची अपील फोटाळली होती.
हेही वाचा