नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांना NDA मध्ये येण्याचे मागेच आवाहन केले होते. या आधी पवारांनी भाजपला समर्थन दिले आहे. 44 पेक्षा अधिक आमदार अजितदादादा सोबत आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रहितासाठी NDA सोबत यायला हवं. अनेक मोठे नेते एनडीएसोबत आहेत. मी देखील काँग्रेस, एनसीपी सोबत राहून पुन्हा NDA मध्ये आलेलो आहे अशी गळ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना घातली आहे. भाजपने पक्ष फोडले, राज्यात भाजपने सरकार पाडलं यात काही तथ्य नाही. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे भविष्यात मोदी यांच्यापुढे विरोधकांचा टिकाव अशक्य असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अनेक दिवसांची मागणी आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा असाच प्रयत्न असून धनंजय मुंडे पियुष गोयल यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. नक्कीच चांगला मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त करतानाच "महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झाला आहे वांदा" अशी कविताही आठवले यांनी म्हणून दाखविली. संजय राऊत मुंबईतून लढणार असल्याचीही टिंगल केली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या पुढाकाराने तयार झालेली विरोधकांची इंडिया आघाडी निगेटिव्ह आघाडी आहे. चुकीच्या पद्धतीने झालेली ही आघाडी आहे. मोदींसमोर याचा टिकाव लागणे अशक्य आहे. मुंबईत बैठकीत इंडिया आघाडीमध्ये केजरीवाल जातील की नाही हे सांगता येत नाही. दिल्लीवरून काँग्रेस आपचे बिनसले आहे असे सांगितले. आरपीआय ला दोन जागा महायुती मध्ये मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल यासंदर्भात भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी बोलणे झाले भविष्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्याशी चर्चेतून मार्ग काढला जाईल.